
वर्ष १९९९ च्या कारगिल युद्धादरम्यान भारतीय लष्कराला पाकिस्तानच्या घुसखोरीबद्दल सावध करणारे लडाखी मेंढपाळ ताशी नामग्याल यांचं निधन झालं आहे. ते ५८ वर्षांचे होते. ताशी नामग्याल यांना १९९९ मध्ये कारगिल युद्धादरम्यान त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी सन्मानित करण्यात आले होते.
मे १९९९ च्या सुरुवातीला, ते आपल्या हरवलेल्या याकचा शोध घेत असताना, त्यांनी पठाणी पोशाखात पाकिस्तानी सैनिकांना बटालिक पर्वत रांगेत बंकर खोदताना पाहिले. हे पाहून नामग्याल यांनी तात्काळ भारतीय लष्कराला अलर्ट केलं होतं, त्यामुळे भारतीय लष्कराला पाकिस्तानच्या गुप्त मोहिमेची महत्त्वाची माहिती मिळाली. या सतर्कतेने भारतीय लष्कराच्या प्रतिसादाला आकार दिला आणि युद्धाचा मार्ग बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
“ताशी नामग्याल यांनी निस्वार्थी भावनेने जे केलं ते नेहमी लक्षात ठेवलं जाईल. त्यांनी देशासाठी जे योगदान दिलं, त्यासाठी भारतीय सैन्य सदैव त्यांचं आभारी राहील. एका देशभक्ताच निधन झालय. लडाखचा वीर-तुमच्या आत्म्याला शांती मिळो. दु:खाच्या या प्रसंगात आम्ही त्यांच्या कुटुंबासोबत आहोत” असं ‘फायर एंड फ्यूरी कोर’ ने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.



