वैजापूरच्या लाख खंडाळा परिसरात बिबट्याची दहशत; कुत्र्याचा फडशा पाडल्याने ग्रामस्थ भयभीत, वनविभागाकडून सतर्कतेचा इशारा

वैजापूर । दिपक बरकसे

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात सध्या वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे ग्रामीण भागात भीतीचे सावट पसरले असून, लाख खंडाळा येथे बिबट्याने थेट मानवी वस्तीत शिरून हल्ला केल्याची थरारक घटना समोर आली आहे.

१८ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास झालेल्या या हल्ल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून, रात्रीच्या वेळी आपल्या घरातही सुरक्षित आहोत का? असा प्रश्न ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. विशेष म्हणजे बिबट्याने एका पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्याचा अर्धा भाग फस्त केल्याने या हिंस्र प्राण्याची भूक आणि दहशत किती मोठी आहे, याची कल्पना येत आहे. या घटनेनंतर वनविभागाची यंत्रणा सतर्क झाली असून प्रशासनाकडून नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, वैजापूर तालुक्यातील लाख खंडाळा येथील भैरोबा मंदिराजवळ श्री. रावसाहेब आप्पा गायकवाड यांचे निवासस्थान आहे. १८ डिसेंबरच्या रात्री १० वाजेच्या सुमारास सर्वत्र शांतता असताना अचानक बिबट्याने मानवी वस्तीत प्रवेश केला. गायकवाड यांच्या घरासमोर असलेल्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने झडप घातली.

बिबट्याचा हल्ला इतका वेगवान आणि भीषण होता की, कुत्र्याला प्रतिकार करण्याची संधीच मिळाली नाही. या हल्ल्यात बिबट्याने कुत्र्याचा अर्धा भाग जागीच फस्त केला. पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली तेव्हा कुत्र्याचे अवशेष पाहून गायकवाड कुटुंब आणि परिसरातील नागरिक हादरून गेले. बिबट्याचा वावर आता थेट उंबरठ्यापर्यंत पोहोचल्याने गावातील भीतीच्या वातावरणात मोठी भर पडली आहे.

घटनेची माहिती मिळताच लाख खंडाळ्याचे पोलीस पाटील दीपक देवकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीची पाहणी केली. बिबट्याचा वावर मानवी वस्तीत आणि विशेषतः मंदिर परिसरात असल्याचे स्पष्ट झाल्याने ही बाब प्रशासनाने अत्यंत गांभीर्याने घेतली आहे.

पोलीस पाटील देवकर यांनी संपूर्ण गावाला सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, बिबट्या हिंस्र झाला असून तो आता अन्नाच्या शोधात थेट वस्तीवर येत आहे, त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये गाफील राहू नये. विशेषतः रात्रीच्या वेळी शेतात पाणी भरण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांनी मोठ्या समूहाने किंवा हातात बॅटरी आणि काठी घेऊनच बाहेर पडावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

या गंभीर प्रकाराची माहिती तातडीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. वनविभागाचे पथक लवकरच घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करणार असून बिबट्याच्या पाऊलखुणांची (पगमार्क) पाहणी केली जाणार आहे. दरम्यान, लाख खंडाळा परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी वनविभागाकडे आक्रमक मागणी केली आहे की, या भागात तात्काळ ट्रॅप कॅमेरे बसवण्यात यावेत जेणेकरून बिबट्याची नेमकी हालचाल आणि त्याचे लोकेशन स्पष्ट होईल. तसेच, बिबट्या मानवी वस्तीत पुन्हा येऊ नये यासाठी तातडीने पिंजरा लावून त्याला जेरबंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. “आमची मुले आणि जनावरे धोक्यात आहेत, प्रशासनाने केवळ सूचना न देता बिबट्याला पकडण्यासाठी ठोस पावले उचलावीत,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस पाटील आणि ग्रामपंचायतीने नागरिकांसाठी नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये प्रामुख्याने नमूद करण्यात आले आहे की, लहान मुले, महिला आणि वृद्ध नागरिकांनी सूर्योदयानंतर आणि सूर्यास्तापूर्वी घराबाहेर पडणे टाळावे. घराच्या परिसरात रात्रीच्या वेळी पुरेसा प्रकाश राहील याची काळजी घ्यावी. ज्यांच्याकडे पाळीव जनावरे आहेत, त्यांनी आपले गोठे सर्व बाजूंनी सुरक्षित करावेत आणि शक्य असल्यास तिथे रात्रभर विजेचा दिवा चालू ठेवावा. बिबट्या प्रामुख्याने अंधाराचा फायदा घेऊन हल्ला करतो, त्यामुळे गावातील सार्वजनिक रस्त्यांवर आणि घराबाहेर अंधार राहणार नाही याची खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांचे अपडेट्स थेट आपल्या फोनवर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलला लगेच जॉइन करा! येथे क्लिक करा.

Get the latest Marathi newsMaharashtra news, and updates from politicselectionsportsentertainmenthealthagriculturebusiness, and religion – only on headlinesmarathi.com.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here