
राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होत असून उन्हाळ्याने जोर धरला आहे. विशेषतः मुंबईसह कोकणातील जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस तीव्र उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे.
भारतीय हवामान खात्याने (IMD) मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. गरज नसल्यास घराबाहेर पडू नये, असा सल्ला नागरिकांना देण्यात आला आहे.
पुढील चार ते पाच दिवस मुंबईसह कोकण आणि राज्याच्या काही भागांमध्ये तापमान ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. पुणे, कोल्हापूर, सोलापूरसह मराठवाडा आणि विदर्भातही उन्हाचा तडाखा जाणवण्याची शक्यता आहे.
हे वाचलं का? – रात्रीच्या प्रवासातील ‘डेथ अवर्स’! अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर
नाशिकमध्येही तापमान वाढले असून, गेल्या काही दिवसांपासून ते ३४ अंशांवर स्थिर आहे. मार्च महिन्याच्या प्रारंभालाच उन्हाळ्याचा प्रभाव जाणवू लागल्याने नागरिकांना अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आरोग्य तज्ज्ञांचा नागरिकांना सल्ला
उष्णतेपासून बचावासाठी पुरेशी काळजी घेण्याचा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवणे गरजेचे असून, गरज नसल्यास उन्हात बाहेर जाणे टाळावे. अत्यावश्यक काम असल्यास टोपी, हेल्मेट किंवा छत्रीचा वापर करावा. घरातून बाहेर पडताना पुरेसे स्वच्छ पाणी सोबत न्यावे आणि सैलसर, हलक्या रंगाचे सुती कपडे घालावेत.
तसेच, तेलकट आणि मसालेदार पदार्थांचे सेवन टाळावे, कारण हे पदार्थ शरीराचे तापमान वाढवतात. उन्हाळ्यातील आरोग्याच्या समस्यांपासून बचाव करण्यासाठी योग्य आहार आणि पुरेशी विश्रांती घेणे महत्त्वाचे आहे. पुढील काही दिवस उन्हाचा तडाखा अधिक जाणवू शकतो, त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
हे वाचलं का? – धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर अत्याचारासाठी १०० रुपयांची सुपारी, हत्येचा ही होता प्लॅन पण…; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार
देशभरात हवामानातील सातत्याने बदल
देशभरात हवामानातील सातत्याने बदल होत असून नागरिकांना विविध हवामान स्थितींना सामोरे जावे लागत आहे. काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडत असताना, काही भागांत उष्णतेची लाट जाणवत आहे. तसेच, काही राज्यांमध्ये बर्फवृष्टी होत असल्याने सामान्य जीवन विस्कळीत झाले आहे.
दिल्ली-एनसीआरमध्ये नुकत्याच झालेल्या पावसाने काहीसा दिलासा मिळाला असला तरी, वाढते तापमान हा अद्याप चिंतेचा विषय आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मे आणि जून महिन्यात तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा



