
राज्यातील कोट्यवधी महिलांचे लक्ष लागून राहिलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. ज्या महिलांचे अर्ज तांत्रिक कारणांमुळे किंवा ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेतील त्रुटींमुळे रखडले होते, अशा महिलांच्या समस्या आता घरबसल्या सुटणार आहेत.
राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले असून, आता अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून प्रत्यक्ष जमिनीवर जाऊन पडताळणी केली जाणार आहे. या निर्णयामुळे ज्या महिलांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही, त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी पूर्ण करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत देण्यात आली होती. मात्र, तांत्रिक अडचणी आणि ऑनलाइन फॉर्म भरताना चुकीचा पर्याय निवडल्या गेल्यामुळे हजारो महिलांची ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण राहिली होती. प्रक्रिया पूर्ण न झाल्याने साहजिकच या महिलांच्या बँक खात्यात योजनेचे हप्ते जमा होणे बंद झाले होते.
या तांत्रिक अडचणींमुळे ग्रामीण भागातील महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर संभ्रमाचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी प्रशासनाला कडक सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी आता केवळ ऑनलाइन माहितीवर अवलंबून न राहता अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष घरोघरी जाऊन लाभार्थ्यांची खातरजमा करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.
आता नव्या निर्णयानुसार, अंगणवाडी सेविका राज्यभरातील संबंधित महिलांच्या घरी जाऊन त्यांची कागदपत्रे आणि ई-केवायसीमधील त्रुटी तपासाणार आहेत. यापूर्वीही अशी जबाबदारी सोपवण्याचे संकेत देण्यात आले होते, मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली नव्हती. आता मात्र मंत्र्यांच्या थेट सूचनेनंतर ही प्रक्रिया युद्धपातळीवर राबवली जाणार आहे. ज्या महिलांची ई-केवायसी प्रक्रिया ऑनलाइन पोर्टलवर ‘रिजेक्ट’ झाली आहे किंवा तांत्रिक कारणास्तव प्रलंबित आहे, त्यांचे प्रश्न आता अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून सोडवले जातील. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रक्रियेवर वैयक्तिक लक्ष द्यावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी हप्त्यापासून वंचित होत्या, त्यांना लवकरच थकीत रकमेसह लाभ मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आदिती तटकरेंनी नेमकं काय म्हटलंय?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना : महत्वाची सूचना !
महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी पर्यंत e-KYC करण्याची मुदत देण्यात आली होती.
तथापि, काही कारणास्तव e-KYC करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. म्हणूनच, योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी (Physical Verification) करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
या योजनेच्या अंमलबजावणीत जिल्हा प्रशासनाकडून होणाऱ्या दिरंगाईचा फटका महिलांना कसा बसतोय, याचे ज्वलंत उदाहरण वाशिम जिल्ह्यात पाहायला मिळाले. वाशिममध्ये अनेक पात्र महिलांना योजनेचे हप्ते मिळणे अचानक बंद झाले आहे. आपल्या हक्काचे पैसे का मिळत नाहीत, याची विचारणा करण्यासाठी शेकडो महिलांनी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली होती. मात्र, यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी महिलांची भेट घेण्यास नकार दिल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला. बराच वेळ विनंती करूनही कार्यालयात प्रवेश न मिळाल्याने महिलांचा संयम सुटला आणि त्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या सरकारी वाहनाला घेराव घातला. या आंदोलनामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, महिलांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे सरकारला तातडीने पावले उचलावी लागली आहेत.
Get the latest Marathi news, Maharashtra news, and updates from politics, election, sports, entertainment, health, agriculture, business, and religion – only on headlinesmarathi.com.



