
वैजापूर । दीपक बरकसे
गरजू कुटुंबांना हक्काचे घर देण्यासाठी सुरू असलेल्या ‘प्रधानमंत्री आवास योजने’ला वैजापूर तालुक्यात प्रशासकीय दिरंगाईचा मोठा फटका बसला आहे. मंजूर झालेली घरकुले लाभार्थ्यांनी कर्ज काढून पूर्ण केली असतानाही, केवळ प्रशासकीय गोंधळ आणि गटविकास अधिकाऱ्यांच्या (BDO) ऐनवेळी झालेल्या बदलीमुळे हजारो लाभार्थ्यांचे दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील अनुदान गेल्या महिन्याभरापासून अडकले आहे. दिवाळी तोंडावर असताना लाभार्थ्यांवर ‘संक्रांत’ ओढवण्याची वेळ आली असून, यामुळे वैजापूरच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र असंतोष पसरला आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना एकूण एक लाख वीस हजार रुपयांचे अनुदान ‘आधार डी.बी.टी.’ (Aadhaar DBT) द्वारे तीन टप्प्यांत दिले जाते. वैजापूर तालुक्यात हजारो घरकुलांना मंजुरी मिळाली असून, बहुतांश कामे प्रगतीपथावर आहेत. पहिला १५ हजार रुपयांचा हप्ता मिळाल्यानंतर, अनेकांनी मोठ्या हिमतीने काम सुरू केले आणि दुसरे-तिसरे टप्पे पूर्ण केले. संबंधित स्थापत्य अभियंत्यांनी लाभार्थ्यांच्या कामांचे छायाचित्र शासकीय पोर्टलवर अपलोड करूनही, सुमारे महिनाभरापासून दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील हप्ते लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत.
या समस्येचे गांभीर्य आणखी वाढले आहे, कारण वैजापूर तालुक्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे. पिकांचे मोठे नुकसान झाले असतानाही, अनेक घरकुल लाभार्थ्यांनी सावकारी कर्ज काढून किंवा खासगी व्यक्तींकडून हात उसने घेऊन घराचे बांधकाम पूर्ण केले. लवकर हप्ता मिळेल, या आशेवर त्यांनी हे कर्ज घेतले.
मात्र, आता दिवाळीच्या तोंडावर, जेव्हा कर्जाची परतफेड करणे अपेक्षित आहे, नेमके त्याच वेळी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी (BDO) यांची बदली झाली. नवीन अधिकारी रुजू होण्यास विलंब होत असल्याने, घरकुल विभागातील निर्णय प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली आहे. लाभार्थ्यांनी गुंतवलेले पैसे अडकल्याने, त्यांना कर्जाचे व्याज भरणे आणि सणासुदीचे दिवस काढणे दोन्ही कठीण झाले आहे.
विशेष म्हणजे, बीडीओ यांची बदली झाल्यापासून वैजापूर पंचायत समितीच्या घरकुल विभागातील अनेक जबाबदार कर्मचाऱ्यांचे भ्रमणध्वनी बंद आहेत. जे सुरू आहेत, ते देखील लाभार्थ्यांच्या प्रश्नांना योग्य प्रतिसाद देत नसल्याने लाभार्थ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. आपल्या हक्काचे अनुदान मिळत नसल्याने लाभार्थ्यांनी ‘पैसे घरात गुंतवणूक करून ऐन दिवाळीत संक्रांत ओढवण्याची वेळ आली आहे,’ अशी उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे.
सामाजिक कार्यकर्ते तथा मुक्त पत्रकार नितीन निंबाळकर यांनी या प्रशासकीय दिरंगाईविरोधात तीव्र भूमिका घेतली आहे. “आम्ही लवकरच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांची भेट घेऊन निवेदन देणार आहोत. येत्या आठ दिवसांत घरकुलाचे थकीत हप्ते खात्यावर जमा न झाल्यास, अनुदानापासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांना सोबत घेऊन आमरण उपोषण किंवा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा निंबाळकर यांनी दिला आहे.
योजनेचे काम पूर्ण करूनही प्रशासकीय अनास्थेमुळे अनुदान अडकल्याने, लाभार्थ्यांच्या दिवाळीवर चिंतेचे सावट पसरले आहे. प्रशासनाने त्वरित यात लक्ष घालून लाभार्थ्यांचे थकीत हप्ते जमा करावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
Get the latest Marathi news, Maharashtra news, and updates from politics, election, sports, entertainment, health, agriculture, business, and religion – only on headlinesmarathi.com.



