
मुंबईतील भ्याड असा २६/११ दहशतवादी हल्ला डोळ्यासमोर आल्यास आजही अंगावट शहारे उमटतात. या हल्ल्यात पोलिसांसह अनेकांना आपला जीव गमवाव लागला होता.
अशात या हल्ल्यासंदर्भातील एक माहिती समोर येत आहे. त्यानुसार, २६/११ दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेला पाकिस्तानी वंशाचा कॅनडाचा व्यापारी तहव्वूर राणा याला लवकरच भारताच्या ताब्यात दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तहव्वूर राणा याला भारतात आणण्याची प्रक्रिया राजनैतिक माध्यमातून सुरू आहे.
हे वाचलं का? – धक्कादायक! पुण्यात डंपरने फुटपाथवर झोपलेल्या ९ जणांना चिरडलं
मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०२४ मध्ये, अमेरिकी कोर्टाने निर्णय दिला होता की, दोन्ही देशांमधील प्रत्यार्पण करारानुसार राणाला भारताकडे प्रत्यार्पण केले जाऊ शकते. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये बॅक चॅनेलची चर्चा सुरू आहे. त्यानंतर न्यायालयाने राणाच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील सहभागाबद्दल भारताकडे प्रत्यार्पणाला विरोध करणारी याचिका फेटाळली. प्रत्यार्पणाचा आदेश योग्य होता हे सिद्ध करण्यासाठी भारताने राणाविरुद्ध पुरेसे पुरावे सादर केले आहेत, असे न्यायालयाने म्हटले आहे.
राणावरील आरोप काय?
मुंबई हल्ल्यात तहव्वुर राणा याचा हात असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले होते. दोषारोपपत्रात सुद्धा त्याचे नाव आहे. तो पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेज इंटेलिजेंस आणि दहशतवादी संघटना लष्कर-ए-तयब्बाचा सक्रिय सदस्य असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. मुंबई हल्ल्यातील मास्टरमाईंड डेव्हिड कोलमॅन हेडली याला राणा याने या हल्ल्यासाठी मदत केल्याचे तपासात समोर आले होते. त्याने हल्ल्यापूर्वी मुंबईतील काही ठिकाणांची रेकी केली होती, असा आरोप आहे.



