
वैजापूर । दिपक बरकसे
शेतातील विद्युत पंप सुरू करण्यासाठी गेलेल्या एका तरुण शेतकऱ्याचा तोल जाऊन विहिरीत पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत तरुणाचे नाव रवींद्र कडू कान्हे (वय 35, रा. पालखेड) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र शनिवारी सकाळी शेतातील विद्युत पंप सुरू करण्यासाठी विहिरीकडे गेला होता. यावेळी पाईप हाताळत असताना त्याचा तोल गेला आणि तो थेट विहिरीत पडला. ही घटना लक्षात येताच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी तातडीने धाव घेत रवींद्रला विहिरीतून बाहेर काढले. त्याला त्वरित वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हे वाचलं का? – AI चा विकृत वापर! महिला डॉक्टरांचे अश्लील व्हिडिओ तयार करून व्हॉटस्ॲपवर केले व्हायरल, वैद्यकीय क्षेत्रात खळबळ
सकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास रुग्णालयात पोहोचल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रवींद्रची तपासणी केली आणि त्याला मृत घोषित केले. या दु:खद घटनेमुळे पालखेड परिसरात शोककळा पसरली आहे. रवींद्रच्या अकाली निधनाने त्याच्या कुटुंबीयांवर आणि गावकऱ्यांवर मोठा आघात झाला आहे.
स्थानिकांनी या घटनेबाबत तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, अधिक तपास सुरू आहे. ही घटना शेतकऱ्यांनी शेतात काम करताना योग्य खबरदारी घेण्याचे महत्त्व अधोरेखित करते.
Get the latest Marathi news, Maharashtra news, and updates from politics, election, sports, entertainment, health, agriculture, business, and religion – only on headlinesmarathi.com.


