
येत्या शनिवारी बकरी ईद साजरी होणार असून, या पार्श्वभूमीवर वैजापूर पोलीस ठाण्याचे नवीन पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी मंगळवारी (दि. ०३ जून) शांतता समितीची बैठक बोलावली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी वैजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व अवैध धंदे, वाहतूक कोंडी, वाळू तस्करी, जुगार आणि व्यसनांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे आश्वासन दिले. बकरी ईद शांततेत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात साजरी व्हावी, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. त्यांनी नागरिकांना शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सहभागी होण्याचेही आवाहन केले.

उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बकरी ईद सणाच्या निमित्ताने शहरातील सर्व समाजघटकांनी एकत्र येऊन बंधुता आणि मानवता जपावी, असे सांगितले. सर्व जाती, धर्म आणि पंथाच्या नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखून सण साजरा करावा, असे त्यांनी नमूद केले. त्यांनी वैजापूरातील शांततापूर्ण वातावरण कायम राखण्यासाठी सर्वांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.
हे वाचलं का? – मागील भांडणाच्या कारणावरून जीवघेणा हल्ला; बंदुकीचा धाक दाखवत ७ तोळे सोने, २ लाख लुटले
बैठकीच्या सुरुवातीला शांतता समितीचे सदस्य धोंडीरामसिंह राजपूत यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट करत नवीन पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांचे वैजापूरवासीयांतर्फे स्वागत केले. या बैठकीत किराणा असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश शेठ बोथरा, अखिल शेख, काझी हाफीजोदीन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

शहरातील विविध समस्यांवरही या बैठकीत चर्चा झाली. दिनेश राजपूत, प्रेम राजपूत, अमोल राजपूत, गौरव धामणे, बाबा धुमाळ, शमीम सौदागर, गौरव दौडे, ज्योती हंगे, सुनीता साखरे, निशा गोरक्ष, काझी हाफीजोदीन, सेवेकरी अकबर, विजय त्रिभुवन आणि शेख धसे यांनी शहरातील अडचणी आणि समस्यांवर प्रकाश टाकला. तसेच, त्यांनी विधायक सूचना मांडल्या. हाजी इम्रान कुरेशी, अकिल कुरेशी, करीम मौलाना, इरफान कादरी, रवी पगारे, श्रीराम गायकवाड, सरपंच दौलत गायकवाड, रियाजुद्दीन शेख, काझी लईक इनामदार, धर्मेंद्र त्रिभुवन, निलेश पारख, शैलेश पोंदे, राजेंद्र जानराव, कचरू राजपूत आणि पोलीस निरीक्षक विजय देशमुख यांच्यासह अनेक नागरिक आणि मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे वाचलं का? – लाचखोरीचा कळस! शेतजमिनीच्या कामासाठी मागितले 41 लाख, उपजिल्हाधिकाऱ्यासह लिपीक ACB च्या जाळ्यात
या बैठकीतून वैजापूरात शांतता, सुव्यवस्था आणि सौहार्द राखण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचे ठरले. नवीन पोलीस निरीक्षकांच्या नियुक्तीमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेला बळकटी मिळेल, अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
Get the latest Marathi news, Maharashtra news, and updates from politics, election, sports, entertainment, health, agriculture, business, and religion – only on headlinesmarathi.com.


