ग्रामपंचायत कार्यालयात कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी; अश्लील शिवीगाळ केली अन् नंतर…

वैजापूर । दिपक बरकसे

वैजापूर तालुक्यातील खंडाळा ग्रामपंचायत कार्यालयात सरकारी कामकाजात अडथळा निर्माण करत कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी संदीप प्रकाश थोरात (रा. खंडाळा) याच्या विरोधात वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 13 फेब्रुवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, खंडाळा ग्रामपंचायत कार्यालयात १३ फेब्रुवारी रोजी कर्मचाऱ्यांचे शासकीय कामकाज सुरू असताना, संदीप थोरात अचानक कार्यालयात आला आणि कर्मचाऱ्यांशी वाद घालण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर शिवीगाळ व मारहाणीत झाले. योगेश पांडुरंग पवार, जो ग्रामपंचायत कार्यालयात लिपिक म्हणून कार्यरत आहे, यांनी या घटनेबाबत वैजापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

हे वाचलं का? – प्रेमात आंधळ्या झालेल्या आईनेच पोटच्या गोळ्याला संपवलं, अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने काढला काटा

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, संदीप थोरात यांनी ग्रामपंचायत कार्यालयात येऊन कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली आणि हाताने मारहाण करत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे कार्यालयातील कामकाजात अडथळा निर्माण झाला. यानंतर लिपिक योगेश पवार यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी संदीप थोरात याच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी वैजापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. तसेच, कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवण्याचे कामही सुरू आहे. पुढील तपासादरम्यान या प्रकरणात अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

हे वाचलं का? – जिल्हा बँकेच्या महिला कॅशिअरचा विनयभंग, तालुका विकास अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

ही घटना घडल्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयातील सुरक्षा व्यवस्था ऐरणीवर आली आहे. सरकारी कार्यालयात अधिकारी व कर्मचारी सुरक्षित नाहीत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सरकारी कार्यालयांमध्ये अशा घटना वारंवार घडू नयेत यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांवरील हल्ले वाढले!

सरकारी कामकाज करत असलेल्या कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. काही नागरिक आपले काम लवकर व्हावे यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात. काही वेळा हा दबाव शिवीगाळ, मारहाण किंवा धमक्यांमध्ये परिवर्तित होतो. त्यामुळे शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी सुरक्षेचे उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक झाले आहे.

प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here